


विषय हार्ड न्युज,पुणे : सातारा जिल्ह्यातील अमली पदार्थ कारवायांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारवर तीव्र हल्लाबोल केला. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा अपेक्षितच होता, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेसला डॅमेज करत असल्याचा आरोप केला.
अंधारे म्हणाल्या, “एका वर्षात दोन विकेट पडल्या असून तिसरी विकेट पडण्याच्या मार्गावर आहे. काल पत्रकार परिषद झाल्यानंतर सातारा पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र, तपास सातारा पोलिसांकडे नसताना ते तिथे का गेले, हा प्रश्न आहे.” सावडी येथे एवढी मोठी कारवाई झाल्यानंतरही तिथे चुकून लिक्विड कसे राहिले आणि अजूनही त्या भागात ड्रग्स फॅक्टरी सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.
त्यांनी सांगितले की, काल साताऱ्यात पाचगणी येथे तिसरी कारवाई झाली. “हिंदुत्व खतरे में आहे, असे म्हणणाऱ्या साताऱ्यात ही कारवाई झाली असून सर्व आरोपी मुस्लिम आहेत,” असा मुद्दा उपस्थित करत त्यांनी तुषार जोशी आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांना थेट सवाल केला. “पाचगणी हे मोठे पर्यटनस्थळ आहे. तिथे ड्रग्सची कारवाई सुरू असताना पालकमंत्री म्हणून तुम्ही काय करत होतात?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
अंधारे यांनी प्रकाश शिंदे यांच्या मालकीचे हॉटेल ‘तेजयश ’ अजूनही तेच चालवत असल्याचा दावा करत, त्याबाबतचे पुरावे पत्रकार परिषदेत दाखवले. “प्रकाश शिंदे यांनी रणजित शिंदे फरार का झाला, हे सांगितले पाहिजे,” असे त्या म्हणाल्या.
“माझ्या पाठीला कणा आहे. तुमच्या जिल्ह्यात एवढी मोठी ड्रग्स फॅक्टरी सुरू असताना तुम्ही कारवाई का केली नाही? मुंबई पोलीस येऊन कारवाई करत आहेत,” असा आरोप करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
शेवटी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी करत अंधारे म्हणाल्या, “प्रकाश शिंदे हे त्यांचे सख्खे भाऊ आहेत. तपास पूर्णपणे निरपेक्ष होण्यासाठी त्यांनी पदाचा त्याग करावा.” मुख्यमंत्री यांची भेट घेण्यासाठी आपण वेळ मागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
