वन्यजीव रक्षणात सर्पमित्रांचे मोलाचे योगदान; अजूनही सरकारी मान्यता अधांतरी
विषय हार्ड न्युज,करंजगाव (ता. भोर, पुणे) —
“डोंगरावर एकच गडबड… अकराच्या सुमारास अचानक काहीतरी हालचाल झाली, झुडपात नजर गेली… आणि समोर दिसला तो काळा, थरकाप उडवणारा १५ फूट लांब अजगर!” — अशी थरारक घटना मंगळवारी वडाचा माळ भागात उघडकीस आली. या अजगराने एका भेकराला विळखा घालून ठार केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ग्रामस्थ भयभीत असून अजगर अजूनही पसार आहे.
शेतकरी धोंडिबा मळेकर आणि संतोष मळेकर हे शेतात जात असताना, त्यांनी ही दृश्ये प्रत्यक्ष पाहिली. तात्काळ गावकऱ्यांना आणि वनविभागाला कळवले. काही वेळातच वनपाल सुग्रीव मुंडे, वनरक्षक समीर जाधव, तसेच सर्पमित्र तबरेज खान आणि धीरज भोंडवे घटनास्थळी दाखल झाले.
गावकऱ्यांचा आवाज ऐकून अजगर भक्ष्य सोडून झुडपात पसार झाला, परंतु त्याच्या विळख्यात मृत झालेला भेकर तेथेच आढळला. वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी राऊत यांनी सांगितले की, “अजगर सापडल्यास त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल.”
सर्पमित्रांचा सन्मान की केवळ उपयोग? — ग्रामस्थांचा सवाल
ही घटना केवळ वन्यजीवांच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारी नाही, तर सर्पमित्रांच्या योगदानाचीही पुन्हा एकदा आठवण करून देणारी आहे. सर्पमित्र तबरेज खान, धीरज भोंडवे, अनिरुद्ध बर्वे आणि रोहित नलावडे यांनी वेळेवर घटनास्थळी पोहोचून गावकऱ्यांची मदत केली.
परंतु अजूनही या सर्पमित्रांकडे अधिकृत ओळखपत्रे, सुरक्षा साधनं वा सरकारी मान्यता नाही. “तेव्हा गरज आहे वनविभागाने अशा प्रशिक्षित सर्पमित्रांना अधिकृत मान्यता द्यावी,” अशी ग्रामस्थांची जोरदार मागणी आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हे कार्यकर्ते जीव धोक्यात घालून वन्यजीव आणि मानव यांच्यातील समतोल राखत आहेत, तरीही त्यांना केवळ ‘स्वयंस्फूर्ती’ म्हणून पाहणे अन्यायकारक आहे.
घटनास्थळी सर्पमित्रांसह शंकर मळेकर, प्रदीप मळेकर, विठ्ठल मळेकर, सुनील मोरे, सुहास गायकवाड आणि अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
करंजगावच्या डोंगररांगांमध्ये वन्यजीवांचा वावर वाढलेला असून, नागरिकांनी जंगल परिसरात सतर्कता बाळगावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे.