विषय हार्ड न्युज,पुणे :”संस्था ही केवळ भिंतींची नव्हे, तर विचारांची, संवेदनांची उभी केलेली एक प्रेरक चौकट असते. जेव्हा एक दिशा, एक भावना आणि विचारधारा असलेली माणसे संस्थेच्या माध्यमातून एकत्र येतात, तेव्हा उत्तम समाजकार्य घडते,” असे प्रतिपादन बाल संगोपन व शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा ममता सिंधूताई सपकाळ यांनी केले.
वसुंधरा फाऊंडेशनच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त ‘वसुंधरा गौरव पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन सोमवारी (दि. १६ जून) करण्यात आले होते. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात हा प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला. पुरस्कार वितरण ममता सिंधूताई सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ विचारवंत श्याम भुर्के अध्यक्षस्थानी होते.वसुंधरा फाऊंडेशनचे अध्यक्ष धनंजय भोसले, ॲड. मनिषा भोसले, राजेश दातार, आनंद सराफ, मोहन ठोंबरे, पियूष शहा, शिरीष मोहिते, उदय जगताप आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
या वेळी प्रिया सावंत, शैलजा लोखंडे, स्नेहल जाधव, अजित माने, सुनील रोट्टी, मेधा जेरे, प्रसाद शिवरकर, विठ्ठल सूर्यवंशी, डॉ. दत्तात्रय शिंदे यांचा ‘वसुंधरा गौरव पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला.”समाजभान असलेल्या व्यक्तींना सन्मानित करण्याची वसुंधरा फाऊंडेशनची परंपरा ही स्पृहणीय आहे. अशा पुरस्कारामुळे कार्यरत व्यक्तींना नवी ऊर्जा मिळते आणि समाजाकडून त्यांच्याकडून अधिक अपेक्षा निर्माण होतात,” असे मत ममता सपकाळ यांनी व्यक्त केले.“वसुंधरा फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांमध्ये त्याग, प्रेम, ममता आणि आच यांचे दर्शन घडते. ही देवमाणसे समाजाचे खरंखुरं आधारस्तंभ आहेत,” असे गौरवोद्गार अध्यक्षस्थानावरून श्याम भुर्के यांनी काढले.
कार्यक्रमात ॲड. मनिषा भोसले यांनी ‘असेच एक झाड होऊया’ ही स्वरचित कविता सादर केली. मोनिका गोखले यांनी भावपूर्ण गणेशवंदनाच्या नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात केली. उत्तरार्धात अवधूत गांधी आणि सहकाऱ्यांनी अभंग, लोकसंगीत आणि भक्ती-शक्ती शिवगीतांचा संगम सादर करत वातावरण भारावून टाकले.सूत्रसंचालन राज देशपांडे आणि शिल्पा देशपांडे यांनी केले. मान्यवरांचे स्वागत धनंजय भोसले, ॲड. मनिषा भोसले, आणि उदय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.