विषय हार्ड न्युज,पुणे :वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अप्रत्यक्षपणे नाव जोडले गेलेल्या विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह व सुधार सेवा, महाराष्ट्र राज्य) जालिंदर सुपेकर यांच्यावर गृह विभागाने कारवाई केली आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या तीन विभागांच्या कारागृह उपमहानिरीक्षक पदांचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे.

या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी सार्वजनिकरित्या काही दस्तऐवज व पुरावे सादर करत सुपेकर यांच्यावर ५०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणात खटला सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. तसेच वैष्णवी हगवणे प्रकरणात हगवणे कुटुंबीयांना सहाय्य केल्याच्या मुद्द्यावरूनही संशय निर्माण झाला होता.
दरम्यान, सुपेकर यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले होते की, “वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाशी आणि पिस्तूल परवाना देण्यासंदर्भात माझा कोणताही संबंध नाही.” मात्र, निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाने त्यांच्या कार्यावर आक्षेप घेत निर्णायक निर्णय घेतला आहे.
गृह विभागाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे की, “विशेष पोलीस महानिरीक्षक हे वरिष्ठ संवर्गातील पद आहे. त्यांच्याकडे ‘कारागृह उपमहानिरीक्षक’ या कनिष्ठ संवर्गातील पदांचा अतिरिक्त कार्यभार देणे प्रशासनाच्या दृष्टीने योग्य नाही.” त्यामुळे या तिन्ही विभागांवरील अतिरिक्त जबाबदाऱ्या सुपेकर यांच्याकडून काढून घेऊन त्या इतर अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आल्या आहेत.
नाशिक विभाग, छत्रपती संभाजीनगर (मध्यम विभाग) आणि नागपूर (पूर्व विभाग) या तीनही ठिकाणच्या पदांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे वैष्णवी हगवणे प्रकरणात चर्चेत आलेल्या अधिकाऱ्यांविरोधातील तक्रारी, सार्वजनिक भावना आणि प्रशासकीय गरज यांचा प्रभाव अधोरेखित झाल्याचे मानले जात आहे.