“टॅक्स भरणाऱ्यांवर कारवाई, अनधिकृतांवर मात्र मौन – दुजाभाव कारवाईवर व्यावसायिकांचा संताप!”
विषय हार्ड न्युज,पुणे: सिंहगड रस्ता परिसरातील शहरातील लोकप्रिय गोयल गंगा खाऊ गल्ली, जिथे चविष्ट पदार्थ आणि मेहनती माणसांचे स्वप्न दररोज फुलायचे. मात्र गुरुवारी सायंकाळी पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने अचानक धडक कारवाई करत अनेक व्यावसायिकांचे संसार उध्वस्त केले. दुकानासमोरील थोडी जागा वापरत होते म्हणून, वर्षानुवर्षे व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई झाली; आणि अनधिकृत टपऱ्या मात्र तशाच सुस्थितीत राहिल्या!
व्यावसायिकांना न विचारता जेसीबीने मालमत्ता उध्वस्त करण्यात आली. पोलिस बंदोबस्तात झालेल्या या कारवाईदरम्यान व्यावसायिकांचे डोळे पाणावले. “आम्ही टॅक्स भरतो, नियम पाळतो. मग आम्हालाच गुन्हेगार का ठरवलं जातं?” असा सवाल अनेकांनी उपस्थित केला. काहींची दुकानं ही त्यांची एकमेव उपजीविकेची साधनं होती.
पालिकेच्या या बेदरकार कारवाईमुळे जनतेमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. नागरिक म्हणतात, “ह्या कारवाईचा हेतू जर अतिक्रमणमुक्ती असेल, तर सगळ्यांवर सारखीच भूमिका घ्या. निवडक कारवाया म्हणजे केवळ ताकद दाखवण्याचा सोयीचा मार्ग.”
प्रशासनाने न थांबता यंत्रणा राबवली, मात्र संवेदना कुठे होत्या? हे केवळ अतिक्रमण नव्हे, तर संघर्ष करत उभे राहिलेल्या आयुष्यांवरचा घाव होता. आज प्रश्न फक्त स्टॉल्सचा नाही, तर प्रशासनाच्या कृतीमागील नीतिमत्तेचा आहे.
हिशोबदारांचा संहार, अनधिकृतांचा सन्मान – हीच का ‘स्मार्ट सिटी’ची व्याख्या?”