विषय हार्ड न्युज,पुणे -जम्मू-कश्मीरच्या पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात पुण्यातील नामवंत उद्योजक कौस्तुभ गणबोटे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने पुण्यात हळहळ व्यक्त केली जात असून, संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.
गणबोटे यांचे पार्थिव कोंढवा येथील साईनगरमध्ये त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार स्वतः उपस्थित राहिले. त्यांनी पार्थिवास श्रद्धांजली वाहत कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. शरद पवारांच्या या उपस्थितीने परिसरातील वातावरण अधिकच भावविवश झाले होते.
या वेळी कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नी संगीता गणबोटे यांनी थरारक अनुभव सांगितला. त्या म्हणाल्या, “आम्ही महिलांनी कपाळावरील टिकल्या काढून टाकल्या. मोठ्याने आजान वाचली, तरीही आमच्या माणसांना त्यांनी ठार मारलं. आमच्या मदतीला कोणीच नव्हतं. आम्ही महिलांनी आमचा जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढला. हा अनुभव कधीही विसरता येणार नाही.”
आज दुपारी कौस्तुभ गणबोटे यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्यदर्शनासाठी स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून आपल्या श्रद्धा व्यक्त केल्या.
या घटनेनंतर दहशतवादाविरोधात जनक्षोभ वाढत असून केंद्र सरकारकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे.