निष्पाप पर्यटकांचा बळी, महाराष्ट्रातील सहा कुटुंबांवर दु:खाचं ढग
विषय हार्ड न्युज,पुणे:-पहलगाम… निसर्गाचा शांत कुशीत विसावलेलं स्वर्गासारखं ठिकाण. मात्र मंगळवारी दुपारी इथे घडलेली एक घटना निसर्गाच्या सौंदर्याला काळवट छाया देऊन गेली. दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा बळी गेला, आणि देश पुन्हा एकदा हादरला.
या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला. डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी; पुण्याचे संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे, तसेच पनवेलचे दिलीप देसले — या सहाजणांनी आपल्या आयुष्याची शेवटची सहल अनुभवली… मृत्यू त्यांना इथल्या डोंगरदऱ्यांत गाठून गेला.
हल्ला इतका भयानक होता की, निवडून निवडून पर्यटकांना लक्ष्य केलं गेलं. ही रेखाटलेली क्रूरता आतून हादरवणारी आहे. बैसारन खोऱ्यात, जिथे फक्त पक्ष्यांचा आवाज ऐकू यायचा, तिथे आता बंदुकीचे आवाज आणि आक्रोश घुमले.

दहशतवाद्यांपैकी एकाचा फोटो समोर आला आहे. त्याच्या हातात बंदूक आहे, पण चेहरा अस्पष्ट… हा फोटोच किती बोलका आहे — क्रौर्याचं ते शस्त्र, पण माणुसकीचा लवलेश नाही.
हल्ल्यानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. एनआयएची टीम श्रीनगरमध्ये दाखल झाली असून, आर्मी, सीआरपीएफ, एसओजी आणि जम्मू पोलिसांनी संयुक्त सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या मदतीने दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येतो आहे.
तत्पूर्वी, हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांची स्केचेसही प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्यांच्या शोधासाठी सुरक्षा यंत्रणा कमालीच्या सतर्कतेने काम करत आहेत.

हल्ल्यानंतर मृत पर्यटकांचे मृतदेह पहलगाममधील हॉस्पिटलमधून श्रीनगरला हलवण्यात आले आहेत. त्या काळजाला चिरत गेलेल्या गोष्टी, आता केवळ आठवणींमध्ये उरतील…
आज महाराष्ट्रातील सहा घरांत केवळ फोटो उरलेत, आठवणी उरल्या आहेत… आणि एकच प्रश्न — “पर्यटनाच्या नावाने निघालो… मृत्यूच्या तावडीत कसे सापडलो?”