श्रीनगर, 23 एप्रिल:
विषय हार्ड न्युज, पुणे ब्युरो:काश्मीरमधील सोनमर्ग आणि गुलमर्ग ही प्रसिद्ध पर्यटनस्थळे आजपासून पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहेत. यामुळे संपूर्ण काश्मीरमध्ये पर्यटनावर मोठा परिणाम झाला आहे. श्रीनगरमधील प्रसिद्ध ‘दल लेक’ परिसर ओसाड झाला असून, येथे नेहमी पर्यटकांनी गजबजलेले शिकारा आणि हाऊसबोट आता रिकाम्या पडल्या आहेत. शिकाराचे चालक बोटीत झोपून पर्यटकांची वाट पाहत आहेत, तर रस्तेही सुनसान आहेत.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पर्यटक धनंजय जाधव आणि पूजा मोरे यांनी काश्मिरी नागरिकांसह दहशतवादाच्या विरोधात आवाज उठवला आहे. त्यांनी लाल चौक येथे विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांसोबत आंदोलन केले. या आंदोलनात “भारत माता की जय” आणि “टुरिस्ट हमारी जान है” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

धनंजय जाधव आणि पूजा मोरे यांनी स्थानिक आमदार आणि खासदारांची भेट घेऊन महाराष्ट्रातील पर्यटकांची व्यथा मांडली. काश्मिरी प्रशासनानेही महाराष्ट्रीयन पर्यटकांसाठी मदतीचा हात पुढे करत सहकार्याचे आश्वासन दिले आहे.
याच दरम्यान, श्रीनगरमधील आर्मी 92 बेस हॉस्पिटलमध्ये पेहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या पर्यटकांची त्यांनी भेट घेतली. पनवेलचे श्री. सुबोध पाटील आणि सौ. माणिक पाटील हे 40 जणांच्या ग्रुपसह या हल्ल्यात सापडले होते. एका पर्यटकाला उर्दू भाषेतील पुस्तक न वाचता आल्यामुळे ठार मारण्यात आले, तर सुबोध पाटील यांच्या मानेला गोळी चाटून गेली. सध्या त्यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू आहेत.
धनंजय जाधव आणि पूजा मोरे या घटनेनंतर मदत आणि संपर्कासाठी पुढाकार घेत असून, जखमींच्या नातेवाईकांशीही ते संपर्कात आहेत. “ही परिस्थिती अत्यंत भयानक असून, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सर्वांनी एकत्र यायला हवे,” असं आवाहन त्यांनी केलं आहे.