Thursday, January 15, 2026

Date:

अग्रलेख ….ठाकरे बंधूंचा पुन्हा एकत्र येण्याचा प्रयत्न – अस्तित्व टिकवण्यासाठी राजकीय तडजोडेचा नवा अध्याय?

- Advertisement -

ठाकरे बंधू—उद्धव आणि राज—१८ वर्षांनंतर एका व्यासपीठावर एकत्र आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वळण दिसू लागले आहे. ही केवळ एकत्र येण्याची भावनिक घटना नाही, तर मराठी अस्मिता, भाजपविरोध, आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तासंघर्ष यांच्या पार्श्वभूमीवर उभा राहिलेला राजकीय मोर्चा आहे.


       राजकीय विभाजनाच्या वादातून वेगळे झालेल्या ठाकरे बंधूंनी हिंदी सक्तीविरोधाच्या मुद्द्यावरून पुन्हा संवाद सुरू केला. सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर झालेला विजय मेळावा याच संघर्षाचे यश मानून पार पडला. उद्धव ठाकरे यांनी “एकत्र आलो आहोत, आता राहणार” असे जाहीर करत भाजपविरोधी युतीचा स्पष्ट संकेत दिला. तर राज ठाकरे यांनी अभ्यासपूर्ण भाषणातून मराठी टिकवण्यासाठी दोघांचे एकत्र येणे गरजेचे असल्याचे पटवून दिले.
परंतु, ही युती केवळ भावनांच्या आधारे यशस्वी होईल का? हे मोठे प्रश्नचिन्ह आहे. एकत्र येणे ही सुरुवात असली, तरी युती टिकवण्यासाठी दोघांनाही ‘मी मोठा की तू?’ या अहंकाराच्या पलीकडे जावे लागेल. मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही जवळीक होत आहे, हेही नाकारता येणार नाही. कारण मुंबई महापालिकेवरची सत्ता टिकवण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे, तर राज ठाकरे यांच्याकडे गमावण्यासारखे फारसे काही उरलेले नाही.
२०१७ मध्ये मुंबई महापालिकेत शिवसेनेला ८४ जागा, तर मनसेला केवळ ७ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे मनसेने मागितलेल्या ५०% जागांची मागणी मान्य करणे उद्धव यांच्यासाठी अवघड आहे. दोन्ही पक्षांचे प्रभावक्षेत्रही सारखेच असल्याने प्रभाग वाटप हा संघर्षाचा मुख्य बिंदू ठरू शकतो.
युती टिकण्यासाठी केवळ भाषा वा भावना पुरेशा नाहीत. भाजपविरोधात ठोस पर्याय निर्माण करायचा असेल, तर ठाकरे बंधूंनी एकत्रित अजेंडा तयार करावा लागेल. मराठी मतांबरोबरच इतर भाषिक, मुस्लिम आणि कोकणी मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी धोरणात्मक योजना आवश्यक आहे. अन्यथा, फक्त घोषणांवर हा ब्रँड फार काळ तग धरू शकणार नाही.
या युतीचा सर्वात मोठा फटका मुख्यमंत्री शिंदे गटाला बसणार हे निश्चित आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सेनेच्या मराठी मतदारांमध्ये विश्वास कमी झालेला आहे. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मुंबईतील मराठी मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे.
एकूणच, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामागे भावना आहे, परंतु भावनांवर टिकणारे राजकारण फार काळ टिकत नाही. या दोघांनी आता केवळ एकत्र आलो एवढ्यावर न थांबता, महाराष्ट्राच्या राजकारणाला नवा पर्याय देण्यासाठी संयुक्त आणि ठोस कृती करावी लागेल. अन्यथा ही युती एक भावनिक प्रसंग म्हणून इतिहासातच मर्यादित राहील.

Share post:

लोकप्रिय बातम्या

More like this
Related

विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष; प्रभागात कामाचीच पोचपावती — आंदेकर कुटुंबाचा दावा

पुणे (प्रतिनिधी पायल पोटभरे) : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग...

पुण्यात लोकशाही धोक्यात; भाजप–महायुतीवर हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल

पुणे( प्रतिनिधी पायल पोटभरे) :  महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६च्या...