


विषय हार्ड न्युज,वर्धा : वर्धा (शहर) पोलीस स्टेशनमधील तत्कालीन ठाणेदार पराग पोटे यांच्या कारभारामुळे खाकीची प्रतिमा मलीन झाल्याचे गंभीर आरोप समोर येत आहेत. न्यायाच्या चौकटीत नव्हे तर सौद्यांच्या सावलीत पोलीस ठाणे चालत होते का? असा सवाल नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्धा शहर पोलीस ठाण्यातील काही कारवाया संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या असून, कायदा-सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीपेक्षा सेटिंग, दबाव आणि व्यवहार यांना प्राधान्य दिले जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळण्याऐवजी पोलीस ठाण्याच्या दारातच निराशा पदरी पडत असल्याचा आरोप केला जात आहे.
काही प्रकरणांत कारवाईला विलंब, तर काहींना विशेष सवलत दिल्याचे दावे होत असून, यामुळे “पोलीस की दलाल?” असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत. खाकीवर विश्वास ठेवणाऱ्या जनतेचा विश्वास या कारभारामुळे डळमळीत झाल्याचेही बोलले जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि खाकीची सन्माननीय प्रतिमा पुन्हा उंचावावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या आरोपांची गंभीर दखल घेऊन सत्य बाहेर आणावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
