


विशाल भालेराव
विषय हार्ड न्युज,मालखेड – खानापूर गणात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून, तिरंगी लढतीचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. या गणात धनराज किसन (बाप्पू) जोरी यांच्या सक्रिय राजकीय प्रवेशामुळे प्रस्थापित राजकीय समीकरणांना धक्का बसला असून, विरोधकांच्या गोटात खळबळ उडाली आहे.
अलीकडेच धनराज जोरी यांचा वाढदिवस खानापूर गणात मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला युवक, महिला, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांची मोठी उपस्थिती लाभली. फटाक्यांची आतषबाजी, शुभेच्छांचा वर्षाव आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, धनराज जोरी यांची वाढती लोकप्रियता स्पष्टपणे दिसून आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे “तुतारी वाजवणारा माणूस” हे निवडणूक चिन्ह गणात प्रभावीपणे पोहोचताना दिसले. याच अनुषंगाने मा. सरपंच रांजेंद्र आप्पा जोरी यांनी धनराज जोरी यांच्यावर ठाम विश्वास व्यक्त करत सांगितले,
“तुतारी वाजवणारा माणूस हा सर्वसामान्यांचा खरा आवाज आहे. धनराज जोरी हे प्रामाणिक, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी झटणारे नेतृत्व असून खानापूर गणाच्या विकासासाठी तेच योग्य पर्याय आहेत.”
धनराज जोरी यांच्या प्रवेशामुळे खानापूर गणातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून, निवडणूक आता चुरशीची व तिरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. वाढता जनसमर्थन, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास आणि लोकांचा प्रतिसाद पाहता, खानापूर गणातील ही निवडणूक येत्या काळात अधिकच रंगतदार ठरणार, यात शंका नाही.
